महापरिनिर्वाणदिनी वैचारिक अभिवादनाकरिता ऐरोली येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकस्थळी भेटीचे आवाहन
समृध्द ग्रंथालय आणि सातत्यपूर्ण व्याख्यानांमुळे 'ज्ञानस्मारक' ही ओळख रूढ
स्मारकाला भेटी देणा-या नामांकित विचारवंत, साहित्यिक, व्याख्यात्यांनी तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर व्यक्तींनी ‘ज्ञान हीच शक्ती’ या बाबासाहेबांच्या विचार प्रणालीवर आधारित हे 'ज्ञानस्मारक' असल्याचे अभिप्राय नोंदविलेले आहेत. त्यांच्याप्रमाणेच याठिकाणी भेटी देणा-या महाराष्ट्र राज्यातील तसेच देशातील विविध राज्यांच्या नागरिकांनी व परदेशी पर्यटकांनीही हे स्मारक म्हणजे बाबासाहेबांच्या सर्वस्पर्शी विचारांचे मूर्तीमंत रुप असल्याचे म्हटले आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या तसेच त्यांच्या चरित्रावर व विचारांवर आधारित पुस्तकांप्रमाणेच येथे आंबेडकरी विचारधारा तसेच महनीय व्यक्तीमत्वांवरील 5 हजारहून अधिक पुस्तकांनी समृध्द ग्रंथालय असून त्यामध्ये ऑडिओ व्हिज्युअल सुविधांनी परिपूर्ण ई-लायब्ररी आहे. हे ग्रंथालय हाच ख-या अर्थाने या स्मारकाचा आत्मा असून या माध्यमातून अभ्यासकांना व वाचकांना विचारांचा खजिना विनामूल्य उपलब्ध आहे. त्यामुळे बाबासाहेबांच्या विचारांना महत्व देणारे हे स्मारक बाबासाहेबांचे पुतळाविरहीत ‘ज्ञानस्मारक’ म्हणून नावाजले जात आहे.
प्रेरणादायी इतर सुविधा दालनांचा नागरिकांवर प्रभाव
बाबासाहेबांचे जीवनचरित्र दूर्मीळ छायाचित्रांतून मांडणारे विशेष दालन हे स्मारकाचे आणखी एक आकर्षण असून या माध्यमातून बाबासाहेबांचा जीवनप्रवास उलगडतोच तसेच त्यापासून प्रेरणाही मिळते अशी भावना तेथे भेट देणाऱ्या असंख्य नागरिकांनी व्यक्त केली आहे.
येथे असलेल्या आभासी चलचित्र प्रणालीव्दारे बाबासाहेबांचे प्रत्यक्ष भाषण ऐकण्याची होलोग्राफिक प्रेझेंटेशन शोच्या माध्यमातून मिळणारी सुसंधी भारावून टाकते अशी भावना तेथे भेट देणाऱ्या प्रत्येकाने वेळोवेळी व्यक्त केल्या आहेत.
एकाच वेळी 200 व्यक्ती ध्यान करू शकतील असे भव्य ध्यानकेंद्र तसेच 250 आसन क्षमतेचे वातानुकुलीत प्रशस्त सभागृह अशा उत्तम दर्जाच्या विविध सुविधा स्मारकामध्ये उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत.
ऐरोली मुलुंड पुलावरून नवी मुंबईत प्रवेश करताना लांबूनच नजरेस भरणारा 50 मीटर उंचीचा भव्य डोम बाबासाहेबांच्या ज्ञानसंपन्नतेचे प्रतीक म्हणून पेनच्या निबच्या आकाराचा करण्यात आलेला आहे.
अशा विविध प्रकारच्या आधुनिक सुविधांनी संपन्न असलेल्या या ज्ञानस्मारकामध्ये मागील 2 वर्षे सातत्याने विविध मान्यवरांच्या व्याख्यानांचे 'विचारवेध' या व्याख्यान शृंखलेअंतर्गत आयोजन करण्यात येत असून या माध्यमातून विचारांचा जागर करण्यात येत आहे. इतर शहरांमध्ये व्याख्यानमालांना उपस्थितीची कमतरता भासत असताना स्मारकातील व्याख्यानांना मात्र श्रोत्यांचा उत्तम प्रतिसाद लाभत असून त्याचीही विशेष नोंद विविध व्याख्यानमालांमध्ये सहभागी होणाऱ्या मान्यवर व्याख्यात्यांनी जाहीरपणे व्यक्त केली आहे.
Comments
Post a Comment