कर्जत मधे कला दिग्दर्शक नितीन देसाई यांनी केली आत्महत्या बॉलीवूड नगरी शोकाकुल
कर्जत - कला दिग्दर्शक आणि निर्माते, नितीन चंद्रकांत देसाई यांनी वयाच्या ५७ व्या वर्षी आत्महत्या केली. वृत्तानुसार, नितीन महाराष्ट्रातील कर्जत येथील त्यांच्या स्टुडिओमध्ये मृतावस्थेत आढळून आला. पोलिसांनी सांगितले की, प्रथमदर्शनी हे आत्महत्येचे प्रकरण असल्याचे दिसत असून पुढील तपास सुरू आहे.
“आज सकाळी श्री नितीन देसाई यांचा मृतदेह एनडी स्टुडिओमध्ये लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. आम्ही सर्व बाजूंनी तपास करत आहोत, असे रायगडचे एसपी सोमनाथ घार्गे यांनी एका निवेदनात म्हटले आहे. अहवालात असे म्हटले आहे की देसाई यांचा स्टुडिओ चांगला चालत नसल्याने आर्थिक ताणतणाव होता. मुंबईपासून 50 किमी अंतरावर रायगडच्या कर्जत परिसरात हा स्टुडिओ आहे.
सुप्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन देसाई यांनी आत्महत्या केल्याची बाब उघड झाल्यानंतर खळबळ उडाली आहे. नितीन देसाई हे मराठी व हिंदी चित्रपटसृष्टी, तसेच मालिका व नाटकांसाठी भव्य असे सेट उभारण्यासाठी प्रसिद्ध होते. मात्र, कर्जतमधील त्यांच्या स्टुडिओमध्ये त्यांनी मंगळवारी रात्री गळफास घेऊन आत्महत्या केल्यामुळे कला, सामाजिक व राजकीय क्षेत्रातून हळहळ व्यक्त केली जात आहे. मात्र, आता त्यांच्या आत्महत्येमागच्या कारणांचा शोध घेतला जात असून त्यासंदर्भात मनसेच्या रायगड अध्यक्षांनी गंभीर दावा केला आहे.
नितीन देसाई यांनी त्यांच्या एन. डी. स्टुडिओमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची बाब बुधवारी सकाळी स्टुडिओमधील कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आली. त्यांनी पोलिसांना कळवल्यानंतर हा सगळा प्रकार उघड झाला. त्यानंतर नितीन देसाई यांच्यावर तब्बल २४९ कोटींचं कर्ज असल्याची बाब समोर आली. कर्जबाजारीपणामुळेच नितीन देसाई यांनी आत्महत्या केल्याची चर्चा आता सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर मनसेचे रायगड अध्यक्ष जितेंद्र पाटील यांनी या प्रकरणात टीव्ही ९ शी बोलताना थेट कला क्षेत्रातील काही नामांकित मंडळींच्या दिशेनं अंगुलीनिर्देश केला आहे.
“काही दिवसांपासून ते अस्वस्थ होते”
जितेंद्र पाटील यांनी नितीन देसाई अस्वस्थ होते असं सांगितलं आहे. “गेल्या अनेक दिवसांपासून ते जरा अस्वस्थ होते. अनेक बाबींवर ते चर्चा करायचे. आर्थिक अडचणी वगैरे तर होत्याच. पण त्यांच्याच कला क्षेत्रातून काही नामांकित व्यक्तींकडून एन. डी. स्टुडिओला शूटिंग येऊ दिल्या जात नव्हत्या. ते हे सगळं माझ्याशी बोलायचे. पण या सगळ्या गोष्टी फार क्लेशदायक आहेत”, असं जितेंद्र पाटील म्हणाले आहेत.
Comments
Post a Comment